करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले काही दिवस कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे, अडचणीत आला आहे. राज्य सरकारने धाडसी निर्णय घेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी चर्चा केली.
शासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा पणन विभागाच्यावतीने वर्गवारीने, किफायतशीर दराने आंब्याची खरेदी करावी. आंब्यावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना कॅनिंनमार्फत हा आंबा पुरवावा. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी हे कारखाने पडेल दराने हा आंबा शेतकऱ्यांकडून उचलत असतात, यंदा तो आत्ताच किफायतशीर दराने त्यांना द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. निर्यात करणे शक्य असेल तर त्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांना लवकरच दिलासा मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.